
लांडोरखोरी उद्यानास ‘अरण्यऋषी’ मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्याची मागणी
मनसे शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव, दि. ११ जुलै २०२५ – लांडोरखोरी येथील सार्वजनिक नैसर्गिक उद्यानास ‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले.
पद्मश्री चितमपल्ली हे प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ, पक्षी व वन्यजीव अभ्यासक आणि आदरणीय साहित्यिक होते. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. ‘अरण्यऋषी’ ही उपाधी प्राप्त झालेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनातून आणि कृतीतून अनेक पर्यावरणप्रेमी पिढ्यांना जागृत केले.
वर्ष २००९ मध्ये जळगाव येथे पार पडलेल्या ‘वसुंधरा महोत्सवा’त चितमपल्ली यांनी सहभाग घेऊन जळगावकरांना प्रेरणादायी विचार दिले होते. त्यामुळे त्यांचे जळगाव शहराशी असलेले नाते विशेष असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसे शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, लांडोरखोरी परिसरातील उद्यानास त्यांच्या नावाने ओळख दिल्यास पर्यावरण जपण्याची जाणीव वाढेल, तर नव्या पिढीला प्रेरणास्त्रोत मिळेल. हा नामकरण उपक्रम मा. चितमपल्ली यांच्या कार्याला मानवंदना ठरेल, असेही प्रतिपादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेतली असून, लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.
या प्रसंगी मनसेचे उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैदाने, विद्यार्थी सेना अध्यक्ष योगेश पाटील, सचिव जितेंद्र पाटील, दीपक राठोड, संजय मोती, विकास पाथरे आदी उपस्थित होते.